अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली. त्यानंतर काल शनिवारी दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन भेटीमुळे राज्याच्या राजकारणात या भेटी कशासाठी आणि का? अशी चर्चा सुरु झाली. त्यातच आज रविवारी सकाळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात भेट घेतली. त्यामुळे दोन दिवसांच्या भेटीमागे नेमके काय घडतंय अशी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच आज राज ठाकरे यांनी मनसेचा ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा देत भाजपाने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवार मागे घ्यावा असे आवाहन पत्राद्वारे केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून या पत्राद्वारे त्यांनी वरील आवाहन केले.
राज ठाकरे आपल्या पत्रात लिहितात की, आमदार कै. रमेश लटके यांच्या निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहिर झाली. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश लटके हे चांगले कार्यकर्त्ये होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांच्या राजकिय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास शांती मिळेल.
माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढविण्याचं धोरण स्विकारतो. तसं करण्यानं आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं.
असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022