ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर टीका करताना शिंदे गटाचीही चांगलीच खिल्ली उडविली. यावेळी भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले, महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांचे काय झाले? या दोन नेत्यांच भाजपाच्या युतीत स्थान काय? असा खोचक सवाल करतानाच जानकर आणि खोतकर यांचं जे झालं तेच शिंदे गटाचं होईल. शिंदे गटाचाही वापर होईल, असे भाकित केले.
रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी वरील भाकित केले. यावेळी जाधव यांनी भाजपावर खोचक शब्दात टीका केली.
यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, आपल्या पक्षाला जनाधार मिळणार का? याबाबत ते अंदाज घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे कुणाच्या कार्यक्रमाला गेले तर त्याबाबत बोलणे चुकीचं आहे. भाजपाचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. देशात छोटे पक्ष शिल्लक न ठेवण्याचं काम भाजपा करत असल्याचा आरोपही केला.
भाजपाच्या डोक्यात सध्या सत्तेची नशा आहे. महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांचे काय झाले? शिंदे गटाचाही वापर होणार. भाजपा त्यांनाही सोडणार नाही, असं सांगतानाच दापोलीत पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असणार आहे. हे मी ठरवलं आहे. उद्या दापोलीत ठाकरे गटाचा आमदार निवडून आलेला दिसेल, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला.
सध्या जे सुरु त्यामुळे भाजपाच्या जुन्या नेत्यांना त्रास होतोय. भाजपाचे पाप धुवत असताना गंगा देखील मैली होईल, अशी खोचक टीका करतानाच जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद नाहीत. आमच्यामध्ये समन्वय आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या मुंबईतील भाषणावर भास्कर जाधव यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर डोळा आहे. मोदी यांनी स्वतः केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला काय देणार याचं अवाक्षर देखील काढलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारख्या उच्चपदस्थ व्यक्तीने इथे येऊन अशी टीका करणं हे एवढ्या मोठ्या उच्चपदस्थ माणसाला शोभत नाही, असा खोचक टोलाही जाधव यांनी लगावला.