शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहिर केल्यापासून मागील सलग दोन दिवसापासून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. आज दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी ठिय्या आंदोलन कऱणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि महिला व विद्यार्थीं आंदोलकांनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्याशिवाय जागा सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा आंदोलक कार्यकर्त्यांशी संवाद साधत एक-दोन दिवसात तुम्हाला असे बसावं लागणार नाही असे सांगत अंतिम निर्णय काही लोकांना भेटल्यानंतर घेणार असल्याचे सांगत राजीनाम्याच्या निर्णयाचा फेरविचार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
यावेळी शरद पवार म्हणाले, राजीनामा देण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती, तर मला खात्री होती की तुम्ही मला होय म्हणाले नसता. हा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय सांगू. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.
वाय बी सेंटरबाहेर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, असा निर्णय घेण्याआधी सहकार्यांशी चर्चा करणं आवश्यक असतं, पण मला खात्री होती, तुम्ही मला ‘होय’ म्हणाले नसता. तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती, पण त्यावेळी मी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्यामागे माझा हेतू काय होता? हे मी तुम्हाला सांगितलं आहे.
शरद पवार म्हणाले, मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरून तुमचे अनेक सहकारी इथे आले आहेत. उद्या माझ्याशी त्यांना बोलायचंय. उद्या संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन… येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढंच याठिकाणी सांगतो. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, याची खात्री देतो, असंही स्पष्टपणे सांगितले.