आज एका वर्तमान पत्रामध्ये पहिल्या पानावर एनडीएच्या कारकीर्दीत ईडीने किती जणांवर कारवाया केल्या. कोणत्या राजकीय पक्षांवर केल्या हे सर्वांना मार्गदर्शक ठरणारे वृत्त आले आहे. या कालावधीत समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्या निवडणूकीनंतरच्या आहेत. त्याबद्दलची शंका दूर करण्यासाठी अन्य पक्षांच्या लोकांवर खटले भरायचे, चौकशी लावायची, अटक करायची या सगळ्या गोष्टी महत्वाचा कार्यक्रम म्हणून घेतल्या जात आहेत असा थेट आरोप नाव न घेता करतानाच त्याला राजकीयदृष्टया आम्ही तोंड देणार आहोत असे प्रत्युत्तरही शरद पवार यांनी भाजपाचे नाव न घेता दिले.
राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात. त्यांनी राज्याचा विचार करायला हवा. त्यांना स्वतःला माहित आहे अनेकदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी भूमिका मांडली. त्यामुळे याच्यात वाद वाढवू न देण्याची जबाबदारी ही राज्यप्रमुखाची आहे. आता बीकेसीमध्ये मेळावा घ्यायला जागा मिळाली आहे याचा आनंद आहे. त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. त्यानंतर जी एक परंपरा आहे त्या परंपरेसंदर्भात पहिल्यांदा मागणी उध्दव ठाकरे यांनी केली असेल तर त्या मागणीवर विलंब लावणे योग्य नाही हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी दसरा मेळावा वादाबाबत व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकारने सण बंद केले होते असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात निर्णय घेतला. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी देशाला आवाहन केले त्या काळात हे सण, उत्सव, सभा, संमेलन, लग्न या सगळ्या गोष्टींवर मर्यादा लावण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय धोरण पंतप्रधानांनी मांडले ते महाराष्ट्राने पाळले याची जाण जाणकारांना असली पाहिजे त्यामुळे ते सणांवर बंदी होते असे काही म्हणोत पंतप्रधानांचा निर्णय योग्य होता असेही ते म्हणाले.