Breaking News

शरद पवार यांची टीका, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ, हीच मोदींची गॅरंटी

आश्वासन, टीका-टीप्पण्णी करणं या पलिकडे सरकारने काय केलं आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी आहे.असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी केला आहे. लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून सुरू असून सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं असे आवाहनही केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरुंबद्दल काहीही बोललं जातं आहे. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हा देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत. त्याच मोदींची गॅरंटी देत आहेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहीरात दिली जात आहे. आज ते सांगत आहेत की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी ग‌‌ॅरंटी दिली असेही सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मविआची बैठक झाली आहे. पुढील आठवडाभरात आम्ही लोकसभेचे उमेदवार जाहीर करू. तुम्ही त्या उमेदवारांना निवडून द्या, तेव्हाच लोकशाहीचे रक्षण होईल असे आवाहन केले. सत्तेचा गैरवापर भाजप करत आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडत आहे. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे, आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी शक्यताही वर्तविली.

यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे. असा आरोप भाजपाने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपाचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला. असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो हिंमत असेल, तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, पण मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपामध्ये आहेत. त्यामुळं भाजपा म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा अशी खोचक टीकाही केली.

शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींचे कालचे भाषण पहा, ते बंगालमध्ये होते. तिथं ममता बॅनर्जीवर बोलले. ममता आणि मी एकत्र काम केलं. त्यांच्या घरी मी गेलो आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या ममता यांचं घर अगदी छोटं, अशा वाघिणीवर जनता कायम विश्वास ठेवत आली आहे, पण त्या वाघिणीवर मोदी बोलत आहेत, हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही, असेही सांगितले.

 

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *