मुंबई: प्रतिनिधी
दिल्लीतील नेते मुजरा करू देत नाहीत म्हणून किरीट सोमय्या यांचा गल्लीत गोंधळ सुरु आहे. केवळ स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी त्यांची जी काही नौटंकी सुरु आहे त्याला मनोरंजनात्क मुल्य आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत जर महाराष्ट्राचे यामुळे मनोरंजन होत असेल तर ते कोण कशाला थांबवेल अशी उपरोधिक टोलाही त्यांनी किरीट सोमय्या आणि भाजपाला लगावला.
सोमय्या हे नेहमी एकाची मालमत्ता तिसऱ्याच्या नावावर दाखवित आले आहेत. त्यामुळे ते कोणत्याही संपत्तीकडे बोट करतात आणि म्हणतात की ही बेनामी संपत्ती आहे. यामुळे नागरीकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. या कारणास्तव अनेक जण आपापल्या संपत्ती घेवून त्याचे ७-१२ सातबारा काढून बसलेले आहेत. त्यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी असंतोष आहे. सोमय्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा बंदी नोटीस काढत आहेत असे ते म्हणाले.
फडणवीस सरकारच्या काळात केवळ कडकनाथ कोंबड्या दाखवल्या म्हणून तुम्ही तर थेट तडीपार करत होतात. लोकांनी आंदोलन करू नये यासाठी तुम्ही लोकांना स्थानबद्ध करत होतात, इतकेच काय तुम्ही तर काळ्या कपड्याची मनाई केली होती, जाहिर सभांमध्येही काळे कपडे घालण्यालाही तुम्ही बंदी घातली होती. सोमय्याच्या नावाने एक भीती आहे यासारख्या अनेक गोष्टी तुमच्या काळात घडत होत्या आणि आज तुम्ही लोकशाहीच्या नावाने गळे काढताय असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
आणि किरीट सोमय्या तक्रारी करत आहेत ना, केंद्रीय तपास यंत्रणाकडे ते तक्रारी करत असून या यंत्रणा आता भाजपाच्या शाखा झाल्या असल्याची टीका करत त्यांचेही काम आता भाजपा नेतेच करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित करत त्यांना जी काही नौटंकी, तमाशा करायचाय ती कायद्याच्या चौकटीत राहुन करावी एवढीच आमची त्यांना विमंती असल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध केल्यानंतर त्यांच्याकडून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरु केली असून शरद पवारांवरही त्यांनी आरोप करायला सुरुवात केली. त्यामुळे महाविकास आघाडीचा पक्ष म्हणून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमय्यांच्या टीकेला आणि त्यांच्या स्थानबद्धतेचे समर्थन केले. तसेच सोमय्यांच्या कृतीला नौटंकी संबोधक त्यास मनोरंनात्मक मुल्य असल्याचे मुद्दाम सांगितले.
किरीट सोमय्या दुसऱ्यांच्या मालमत्ता तिसऱ्याच्या म्हणून दाखवतात.कोणाच्याही जागेकडे बोट दाखवून बेनामी म्हणतात म्हणून जनतेत भीती आहे. याचकरिता बंदी घातली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या असतानाही त्यांचे काम भाजपा करणार का? सोमय्यांनी नौटंकी कायद्याच्या चौकटीत करावी pic.twitter.com/tTCCgXnZWB
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 19, 2021