अमृतसर-मुंबई: प्रतिनिधी
पंजाब काँग्रेसमधील सिंग आणि सिध्दू संघर्षाला पूर्णपणे बाजूला सारत आणि धक्कातंत्राचा वापर करत काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी येथील ज्येष्ठ मंत्र्यांची मुख्यमंत्री वर्णी लावण्याऐवजी तरूण ४८ वर्षीय चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिष रावत यांनी ट्विटरद्वारे केली.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संध्याकाळी झालेल्या काँग्रेस विधिमंडळाच्या बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आले. पंजाबच्या मुख्यमंत्री पदी आपल्याच व्यक्तीची नियुक्ती व्हावी म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्याकडून प्रयत्न सुरु होते. त्यामुळे सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती.
परंतु काँग्रेसने या सर्वांना बाजूला सारत दलित समाजाचे असलेले आणि तरूण अशा चरणजीत सिंग चन्नी यांची निवड केली. चरणजीत सिंह चन्नी यांच्या निवडीनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले सुखजिंदर सिंग रंधावा यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा हायकमांडचा निर्णय असून मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत. मी अजिबात निराश नाही.
पंजाबमध्ये ३० टक्के दलित समाज असून याच बळावरच एकेकाळी स्व.कांशीराम यांनी बसपाचा वरचष्मा तयार केला होता. तसेच विधानसभेत आणि लोकसभेत मोठ्या संख्येने आमदार-खासदार म्हणून निवडूण आणले होते. मात्र नंतरच्या काळात मायावती यांनी पंजाबमधील बसपाकडे दुर्लक्ष केल्याने आता बसपाची पुर्वीसारखी ताकद राहीली नाही. आता फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या विधानसभआ निवडणूकीत काँग्रेस या दलित समाजाच्या व्होट बँकेची आवश्यकता वाटत आहे. या निमित्ताने काँग्रेसपासून दुरावलेली दलित व्होट बँक परत मिळविण्यासाठी चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण आहेत चरणजीत सिंग चन्नी?
चरणजीत सिंग चन्नी हे १२ शिकलेले असून येथील दलित समाजातून आलेले आहेत. २०१७ साली ते उच्च शिक्षण मंत्री असताना त्यांच्या शिक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली. २०१५-१६ मध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. ते चमकौर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत.
सुरुवातीच्या काळात ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळचे होते. मात्र कालांतराने ते अमरिंदर सिंग यांच्यापासून दुरावल्याने आता ते त्यांचे कट्टर विरोधक म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले जातात. कॅप्टन यांच्या विरोधात चन्नी यांनीच आवाज उठविला होता.
https://twitter.com/Charanjitchinni/status/1439580237289779205?s=20