३ मे रोजी मनसेच्या पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यावेळी पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी याबाबत जाहिर भूमिका मांडत या भोंग्याबाबतचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो अशी भूमिका घेत भोंग्याच्या विरोधात हनुमान चालिसा वाजविणार नाही असे जाहिर केले. त्यावरून राज ठाकरे यांनी मोरे यांना मुंबईत बोलावून घेत फटकारल्याची चर्चा आहे. त्यानंतरही मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र न करता पक्षातच राहणे पसंत केले. त्यानंतर मोरे यांना मिसळ महोत्सव घेण्याचा सल्ला आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती दस्तुरखुद्द वसंत मोरे यांनीच दिली.
त्यानंतर काल मनसेच्यावतीने महाआरतीचे काल आयोजन करण्यात आले होते. या आरतीला मनसे प्रमुख राज ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. मात्र राज ठाकरे हे तिकडे फिरकलेही नाहीत. त्यानंतर आज वसंत मोरे यांनी भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी मिसळ महोत्सव आयोजित करण्याचा सल्ला दिल्याचे मोरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुकारलेल्या भोंगे काढण्याबाबतच्या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. पण अखेर वसंत मोरे यांनी काल शनिवारी कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली.
काल मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. असं असताना ते वसंत मोरे यांच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होते. त्यानंतर आज मनसे नेते वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचं पुण्यातील निवासस्थान राजमहाल याठिकाणी ही भेट झाली.
या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना मोरे म्हणाले की, राज साहेब ठाकरे काल पुण्यात येणार असल्याचं मला माहीत नव्हतं. तुमच्या प्रसार माध्यमांमुळेच साहेब पुण्यात येणार असल्याची माहिती मला मिळाली. पण त्यापूर्वीच मी महाआरतीचं आयोजन केले होते. त्याबद्दल राज ठाकरेंना मेसेज करून कळवलं होते. तसेच या महाआरतीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या महाआरतीनंतर आज राज ठाकरे यांची पुण्याच्या निवासस्थानी भेट घेतली.
आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींबाबत चर्चा झाली. काल झालेल्या महाआरतीचं साहेबांनी कौतुक केलं. तसेच साहेबांना काल येता आलं नाही. पण ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो,’ असा सल्ला त्यांनी दिला. तसेच राज ठाकरेंना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितलं आहे. साहेब निश्चित लवकरच येतील, त्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
