एकाबाजूला सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा याचिकेवर आणि विधानसभा अध्यक्षांना असलेल्या अधिकार प्रश्नी याचिका प्रलंबित आहेत. या याचिकांवर २१ फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी सुरु होणार आहे. मात्र न्यायालयाच्या या निकालाआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे आणि शिंदे गटाने केलेल्या दाव्यावर शिवसेना आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्य बाणाबाबत एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले असतानाच ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी मात्र मोठे विधान करत आयोगाने मोठी चूक केली असल्याचे वक्तव्य केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर कायदेतज्ञ उल्हास बापट हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आयोगाने चूक केल्याचे विधान केले.
यावेळी बोलताना उल्हास बापट म्हणाले, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निकाल दिला. मात्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर आपला निकाल द्यायला नको होता. निवडणूक आयोगाने मोठी चूक केली आहे, असे मत व्यक्त केले.
तसेच यावेळी बोलताना उल्हास बापट म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय म्हणजे राजकीय भूकंप आहे. या निर्णयाचे काय परिणाम होणार, या निर्णयाचा फायदा तसेच तोटा किती झाला, हे काळच ठरवेल. सर्वोच्च न्यायालय कदाचित आगामी चार ते पाच दिवसांत आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या खटल्याचा निकाल देऊ शकते. कारण आता या खटल्याची सलग सुनावणी होणार आहे, असेही स्पष्ट केले.
तसेच सध्या सुरु असलेल्या सुनावणीबाबत बोलताना उल्हास बापट म्हणाले, सध्याचे पाच सदस्यीय घटनापीठ आमदारांच्या अपात्रतेचा तसेच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबतचा खटला कोणत्याही क्षणी सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याचाही निर्णय घेऊ शकते. विद्यमान पाच सदस्यीय घटनापीठाने तसा निर्णय घेतला, तर हा खटला वर्षभर चालेल. मात्र सध्याच्याच पाच न्यायमूर्तींनी या खटल्यावर निकाल दिला आणि तो निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात लागला, तर मग गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या अगोदरच हा निर्णय देऊन गंभीर चूक केली असल्याचेही मत व्यक्त केले.