निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. शिंदे गटातील आमदार, खासदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने आयोगाच्या या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाशी युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी निवडणूक आयोगाचा निकाल तसेच ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या निर्णयाचे स्वागत करत म्हणाले, निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी या आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर ही लढाई अद्याप संपली नसल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यामुळे आगामी महापालिका तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणत्या बाजूने जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केंद्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे जे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडूण येतात, त्यास विधानसभा-लोकसभेबाहेर असलेल्या त्या राजकिय पक्षाची भूमिका आणि नेत्याच्या करिष्मामुळेच पक्षाने उमेदवारी दिलेले उमेदवार निवडूण येतात मात्र आता या सर्व लोकशाही व्यवस्थेतील राजकिय घटकांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण आलेल्या व्यक्तींच्याच करिष्म्यावर पक्षाचे अस्तित्वात असल्याचे एकप्रकारे या निकालाने अधोरेखित केले असून राजकिय पक्ष म्हणून त्यांचे अस्तित्व नाकारल्याचे दिसून येत आहे.