महाराष्ट्राला आणि पश्चिम बंगालबद्दल मुद्दाम टीपण्णी करण्यात आली. त्यामुळे आम्हाला जी खरी माहिती जाहीर करणे भाग पडले. ते साऱ्या देशाचे पंतप्रधान आहेत एका पक्षाचे नाहीत. त्यांच्याकडून देशाच्या शस्त्रुशी लढण्याची अपेक्षा असताना ते त्यांच्या पक्षांच्या शस्त्रुंबरोबर लढण्याचे काम ते करत आहेत. पक्षाच्या विरोधकांच्या मागे ईडी, फिडी लावण्यापेक्षा हिंमत असेल तर चीनला एकदा धमकावून दाखवा ना असे आव्हान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता दिले.
मागील काही दिवसांपासून स्त्रोत आणि चालिसावरून सध्या जे काही सुरु आहे. त्यामुळे त्यांचा कोणी गैरवापर करतंय का? याविषयीचा माझ्या समोर प्रामुख्याने प्रश्न आहे. परंतु त्यामागे लागलेल्यांना कसं वाचवायचं याचा विचार मी करतोय असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत मनसेप्रमुख राज ठाकरेंबद्दल अप्रत्यक्ष काळजी असल्याची कबुली देत पण भोंग्यांवरून किंवा अजाणवरून सध्या जे कोणी बांग देत आहेत त्यांच्याकडून हा विषय आता काहीही मुद्दा नसताना का उचलला असा खोचक सवाल करत जसं लॉकडाऊन सगळ्या देशभरात एकदाच केला. तसेच भोंग्याच्याबाबत न्यायालयाच्या आदेशप्रमाणे संपूर्ण देशात एकच निर्णय करावा असे आव्हान त्यांनी केंद्र सरकारला दिले.
महाराष्ट्र दिनानिमित्त एका मराठी वर्तमान पत्राला दृकश्राव्य माध्यमातून मुलाखत देताना मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात भाष्य केले.
राज्यात सध्या जो काही केंद्र विरूध्द राज्य सरकार असा संघर्ष दिसतोय त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, परवा जी काही बैठक झाली. त्या बैठकीत पेट्रोल-डिझेलचा हा काही चर्चेचा मुद्दा नव्हता. परंतु त्यांनी अचानक तो मुद्दा उपस्थित करत विशेषत: महाराष्ट्राला आणि पश्चिम बंगालबद्दल मुद्दाम टीपण्णी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तसेच उगीच ताटातल्या लोंच्यासारखे काहीही नसले की पाकिस्तानचा मुद्दा बोलून दाखवायचा अशी खोचक टीका करत त्यांच्या ताटात सध्या पाकिस्तानचा मुद्दा म्हणजे ताटातील लोंच्याप्रमाणे झाला असल्याची टीकाही त्यांनी केली.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे काहीही झाले नाही. कोरोना काळात देशभरातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांची नावे घेतली गेली. त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजे माझे नावही घेतलं गेलं. पण काहीच केलं नाही. जे काही केलं ते सगळं प्रशासकिय यंत्रणेने केले, त्यामुळे याचे जे काही श्रेय आहे. ते त्यांचे आहे. त्या कामावरून विरोधकांकडून कौतुक होईल असे वाटलं होतं. मात्र त्या चांगल्या कामातही त्यांना भ्रष्टाचार पाह्यला मिळाला असा खोचक टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.