मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांनी महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण सुरु केल्याचा आरोप जातीतील भांडणे त्यांना हवी आहेत असा गंभीर आरोप शरद पवारांवर केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे यांचे एक वैशिष्ट आहे ते तीन चार महिने कुठे तरी गायब होतात आणि त्यानंतर ते अचानक व्याख्यान देतात. त्यानंतर पुन्हा ते तीन चार महिने गायब होतात असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
कोल्हापूरात विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आले असता त्यावेळी शरद पवार हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे कौतुक केले. मला माहित नाही त्यांना उत्तर प्रदेशात काय विकास होताना दिसला. पण त्यांना उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे वर्षभर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली हे दिसले नाही. तेथे जो काही निवडणूकांचा निकाल लागला त्याची कारणे वेगळे आहेत. मात्र त्यांना विकास होताना दिसला कुठे दिसला माहित नसल्याची टीकाही त्यांनी केली.
त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या तोंडाला आपण मर्यादा घालू शकत नसल्याचे स्पष्ट करत ते काहीही बोलतात असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व राज्याच्या विधान परिषदेत पहिल्यांदा छगन भुजबळ हे होते. त्यानंतर मधुकर पिचड होते. अशी यादी बघितली लक्षात येईल की सर्व जाती-धर्माच्या व्यक्तींना सोबत घेवून राष्ट्रवादीची वाटचाल सुरु आहे. मागील ३० वर्षापासून अजित पवार हे निवडूण येत आहे. त्यामुळे यंदा त्यांना संधी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, ज्या मोठ्या व्यक्तीमत्वावर आपण टीका करताय त्यांच्या चरणी तुम्हीही सल्ला मसलतीसाठी जात होताच ना. मग आजच ते जातीपातीचे राजकारण कसे करतायत याची आठवण झाली असा उपरोधिक टोलाही लगावला.
त्याचबरोबर शिवतीर्थावर भाजपाचा लाऊडस्पीकर वाजत होता असे सांगत राज्य सरकारने काल अनेक कार्यक्रम केले. त्या कार्यक्रमावर बोलण्यापेक्षा त्याच्या भोंग्याचे काय, ह्याच्या भोंग्याचे काय असले काही तरी बोलत बसले. भाजपाबरोबर जे काही आहे ते आम्ही बघायला समर्थ आहोत. आम्हाल कोणा तिसऱ्याची गरज नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनाही यावेळी लगावला.