गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत महाराष्ट्रातील जाती-पातीला शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तर ईडीने नोटीस बजावली म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सांगितले की मला अटक करा पण कुटुंबियांना हात लावू नका असा अरे मग आधी घरच्यांना सांग ना मुंबई महापालिकेत जावू नको म्हणून, तुम्ही राजकारण करता मग समोरच्यालाही राजकारण करता येते असे सूचक वक्तव्य केले.
राज ठाकरे यांच्या या टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी खोचक उत्तर देत म्हणाले की, आता आम्हाला थोडासा वैद्यकीयशास्त्राचा अभ्यास करावा लागेल की अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. भाजपा आणि आमच्यात काय झाले ते आम्ही बघून घेऊ, तिसऱ्याची आम्हाला गरज नाही, आमच्यात जे काही झालं ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही यात पडायची गरज नाही. भाजपाचा लाऊडस्पीकर काल शिवाजी पार्कात वाजत होता, स्क्रिप्ट त्यांची होती, टाळ्या त्यांच्या होत्या आणि घोषणादेखील त्यांच्या होत्या असा उपरोधिक टोलाही लगावला.
शरद पवारांनी जातीवाद परसरवला असे म्हणता…पण सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी तुम्हीदेखील जात होतात. कशासाठी इतक्या मोठ्या माणसांवर बोलायचे. तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळतात पण त्यादेखील प्रायोजित आहेत असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
काल मेट्रोचे तसेच इतर काही प्रकल्पांचे उद्घाटन झाले, त्याच्यावर बोला. तुमच्या भोंग्याचे, यांच्या भोंग्याचे काय करायचे यासाठी सरकार समर्थ आहे. मात्र शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा होता अशी खरमरीत टीका करत अक्कलदाढ उशिरा येते हे काल महाराष्ट्राला दिसले असा टोलाही लगावला.
काल त्यांनी मराठी भाषा भवनचे स्वागत करायला हवे होते. महाराष्ट्राच्या राजधानीत इतके मोठे कार्य घडले आहे. त्याच्याविषयी काही बोलले नाहीत. फक्त टीका केल्याने काय मिळते? आहे ते देखील गमवून बसाल खोचक सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला. भाजपा त्यांची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.
या देशात असे अनेकदा झाले. शेवटी बहुमत निर्माण होते तेव्हा सरकार बनते. युतीचे बहुमत झाले नाही. आघाडीचे बहुमत झाले. राज्याच्या स्थैर्यासाठी, खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनले आहे हे त्यांना माहित असल्याचेही त्यांनी यावेळी आघाडी सरकारवरील टीकेला उत्तर देताना सांगितले.