Breaking News

अजित पवार यांचा सवाल, बहुमताचे सरकार आहे ना, मग अधिवेशन का घेत नाही? शिंदे-फडणवीस सरकारवर उठविली टीकेची झोड

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोरांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापनापन्न झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने आमचे सरकार हे बहुमताचे आणि जनतेचे सरकार असल्याचा दावा करत आहेत. मात्र महिना होत आला तरी या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यावरून आणि पावसाळी अधिवेशन घेतले जात नसल्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली.

बॅलार्ड पीअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक माजी मंत्री आणि नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यात बहुमताचे सरकार आहे. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हा जनतेचा अपमान आहे अशी टीका करत ते पुढे म्हणाले, राज्यात बहुमताचे सरकार असताना अधिवेशन का घेतले जात नाही, अधिवेशन घ्यायला तुम्हाला कोणी अडवलं आहे? असा सवालही शिंदे-फडणवीस सरकारला विचारला.

राज्यात सध्या अतिवृष्टी सुरू आहे. आमचे अनेक आमदार त्या भागात जाऊन पाहणी करत आहे. या सगळ्या परिस्थितीत पालकमंत्री असणे महत्वाचे आहे. पालक मंत्री असेल अशावेळी स्थानिक पातळीवर निर्णय घेणे आवश्यक असते. मात्र हे प्रश्न मांडण्यासाठी विधिमंडळ हे हक्काचे ठिकाण आहे. परंतु, अधिवेशन होत नसल्याने हे प्रश्न मांडायचे कुठे, असा सवालही त्यांनी यावेळी त्यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्य सरकराकडे केली. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्रही लिहीले आहे. राज्यात सध्या अतिवृष्टी सुरू आहे. कधी नव्हे ती यंदा जुलै महिन्यात धरणं भरली आहेत. विदर्भ, मराठावाड्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, असं ते म्हणाले.

राष्ट्रपती निवडणुकीच्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री या दोघांचीही भेट घेतली. तसेच या प्रकरणात तातडीने लक्ष घाला अशी विनंती केली. मात्र, अद्याप काहीही प्रयत्न सरकारकडून झाले नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांना नेहमीच्या नियमांप्रमाणे मदत करून चालणार नाही. नियमांच्या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी लागेल. निसर्ग असेल किंवा इतर वादळे असतील, त्यावेळी एसडीआरएफचे नियम बाजुला ठेऊन महाविकास आघाडी सरकारने मदत केली होती. तशा पद्धतीने आताही मदत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षण आमच्यामुळेच मिळालं, असा आव आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत आहे. मात्र, ही मागणी सर्वांची होती आणि यासाठी सर्वांनीच मदत केली असे सांगत भाजपाला खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *