ओबीसी आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतर आता राज्यातील महापालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील ९ महानगर पालिकांमधील निवडणूका घेण्याच्या अनुषंगाने मतदार याद्या प्रसिध्द करण्याचे आदेश दिले. तसेच या मतदार याद्यांवरील हरकती व सूचनाही घेण्याचा कार्यक्रमही दिला आहे.
त्यानुसार औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रारुपाच्या स्वरुपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत संबंधित ठिकाणी हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदीं संदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.