मुंबई: प्रतिनिधी
आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करत असून सरकारला निर्णय घेता येत नसल्याने सरकार यापासून पळ काढत आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.
सभागृहनेते चंद्रकांत पाटील हे मागील आठवडयात तेच बोलत आहे आणि आजही तेच बोलत आहेत. त्यामुळे सरकारकडे आलेला मागास आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल सरकार पटलावर का ठेवत नाही असा संतप्त सवालही त्यांनी केला.
अजितदादा पवार यांनी सभागृहामध्ये अहवाल पटलावर ठेवा आम्हांला त्याचा अभ्यास करायचा आहे. हा आमचा अधिकार आहे असे ठणकावतानाच आज मराठा समाज मुंबईत मोर्चा काढत आहेत परंतु सरकार कार्यकर्त्यांची धरपकड करत आहे. मराठा समाज शिस्तबध्द मोर्चे काढत असताना सरकार असं का करत आहे ? असा सवालही त्यांनी केला.
सभागृह नेते चंद्रकांत पाटील हे मुस्लिम समाजाचे आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले नाही आहे. उच्च न्यायालयाने फक्त शिक्षण क्षेत्रात ५ टक्के आरक्षण मान्य केले आहे असे सांगत आहेत. त्यावर बोलताना मंत्र्यांनी जरा अभ्यास करून बोलावे असे अजितदादांनी ठणकावले शिवाय भाजप-शिवसेना धर्माच्या आधारे आरक्षणाच्या मुद्दयाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.