मुंबई : प्रतिनिधी
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर या शहिदांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मात्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही २६-११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचा विसर राज्य सरकारला पडल्याचे दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला. अखेर विरोधी पक्षनेत्यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्य सरकारकडून २६-११ तील शहिदांना आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव सरकारकडून सभागृहात मांडण्यात आला.
सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारकडून मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचा ठराव मांडला जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, सरकारने तसा ठराव न मांडल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाच्या अध्यक्षांकडे तशी मागणी केली. ते म्हणाले की, या हल्ल्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचे अनेक अधिकारी व जवान शहिद झाले. अनेक निरपराध नागरिकांचाही बळी गेला. त्यामुळे विधानसभा सुरू असताना आदरांजली अर्पण करून त्यांचे स्मरण केले गेले पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही विखे पाटील यांच्या मागणीला अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाची भावना लक्षात घेता मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला.