मुंबईः विशेष प्रतिनिधी
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या प्रश्नावर विधानसभेतील चर्चेदरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही मोठे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी आणि पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगत त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदार आणि विकासकांशी असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
तसेच राज्यातील काही महत्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकारच्या सहकार्याची गरज लागणार असून या कामी भाजपा नेते फडणवीस यांच्या मदतीची आवश्यकता लागणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या चर्चेला उत्तर दिल्यानंतर भाजपाच्या काही आमदारांनी मुंबईतील घरांच्या प्रश्नावर आणखी काही सूचना करण्याचा प्रयत्न सभागृहात केला. त्यावेळी आव्हाड यांनी अत्यंत मिश्किलपणे म्हणाले की, मी दोन वर्षाचा लहान अर्थात दोन महिने झाले या विभागात येवून. मात्र तुम्हा सर्वांच्या अपेक्षा माझ्याकडून जास्त आहेत. मात्र मागील ५ वर्षात तुम्ही काहीच सभागृहात बोलले नाहीत. त्यामुळे ही वेळ तुमच्यावर आली आहे. त्यावेळी बोलले असतात तर ही वेळ आली नसती अशी उपरोधिक सूचना करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर अप्रत्यक्ष टीका केली.