नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसतंर्गत अध्यक्ष पदावरून राजकिय घमासान सुरु झालेले असतानाच युपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत एक ठराव करण्यात आला. त्यावर अद्याप शरद पवार यांची प्रतिक्रिया अद्याप व्यक्त केलेली नसली तरी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली.
नवी दिल्ली येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद घ्यावे यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी मांडत या ठरावाला पाठिंबा असणाऱ्यांनी हात वर करण्याची सूचना केली. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनीच हात वर करून या ठरावाला अनुमोदन दिले. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्वावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे. त्यातच आता राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली आहे.
दरम्यान यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सावध प्रतिक्रिया व्यक्त केली असून ते म्हणाले की, हा सर्वांनी एकत्र मिळून घेण्याचा निर्णय आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी असून त्या काम करत आहेत. देशातील सर्व पक्षांचा विचार करुन त्यावेळी सोनिया गांधींना अध्यक्ष केले होते. एकत्रित सगळे बसल्यानंतर यावर चर्चा झाल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल.
काँग्रेसचं अस्तित्व देशातील राज्यांमध्ये होतं, बऱ्याच राज्यांमध्ये आजही आहे. पण असे निर्णय कोणी वक्तव्यं करुन होत नाहीत. काँग्रेस पक्ष हा देशातील एक प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासहित सर्वांना एकत्रित बसून चर्चा करत युपीएची पुढील वाटचाल ठरवण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नाना पटोले यांनी २०२४ मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील असं ट्वीट केलं आहे. त्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा, लोकसभेनंतर प्रत्येक पक्षाला आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण परिस्थिती पाहूनच शेवटच्या काळात देशात आणि राज्यात पक्ष निर्णय घेतील याची खात्री आहे.
काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखले जाऊ शकते असेही या ठरावात सांगण्यात आलेय.
देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवे. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवे अशी मागणीही या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
पवार साहब ने रक्षा, कृषि मंत्री के रूप में देश के विकास में उल्लेखनीय योगदान दिया है.विपक्ष के नेता और NDRF अध्यक्ष के रूप में भी कार्य किया है. देश के सभी गैर भाजपा राजनीतिक दलोंको एकसाथ लाने में पवार साहब बहोत बढ़ी भूमिका निभा सकते हैं और देश को एक नई राजनितिक दिशा दे सकते हैं
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) March 29, 2022