मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद हीच्यात वाद सुरु आहे. तसेच या वादात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातही वाद निर्माण झडायला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका कर भाजपावर निशाणा साधला.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपामध्ये खूपच कर्तृत्वान महिला (चित्रा वाघ) आहेत भले आमदार नसतील पण संघटनेत तर आहेत ना, पण त्यांना भाजपाला महिलांचा आदर किंवा प्रेम, आस्था नसल्याची खोचक टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसार माधम्यांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, मंत्रीमंडळ आहे कशासाठी? दोनच लोक सगळे निर्णय घेणार असतील तर मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी करायचं तरी काय? सगळ्यात मोठी अडचण आहे की आज सर्वसामान्य मायबाप जनतेने न्याय मागायला कोणाकडे जायचं?, त्यांना जर अडचण आली तर त्यांनी कुणाकडे जायचं? जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही आणि महानगरपालिकांचेही निवडणूक झाली नाही. ईडी सरकार येऊन सहा महिने झाले आहेत, मग हे निवडणुका का घेत नाहीत? त्यांना कशाची भीती आहे निवडणूक घ्यायला? असा सवालही शिंदे-फडणवीस सरकारला केला.
भारतीय जनता पार्टीमध्ये नक्कीच खूप कर्तृत्वान महिला आहेत, आमदार म्हणून किंवा आमदार नसल्या तरी संघटनेत तरी आहेतच ना? मात्र यांना (भाजपाला) महिलांबद्दल मनात आदर नाही किंवा प्रेम, आस्था नाही, हे त्यांच्या कृतीमधून दिसतं आहे. असा खोचक टोलाही त्यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता भाजपाला लगावला.
ईडी सरकार म्हणजे टेलिव्हिजनवर येणे, धमक्या देणे. मी बच्चू कडू यांचे आभार मानते. कारण, त्यांनीही एक विधान केलं होतं, की आज हे सरकारमधील आमदार कुठेही गेले तरी लोक त्यांना म्हणतात की ५० खोक्यांचा आमदार आला. हे मी म्हटलेलं नाही, हे मी वृत्तवाहिन्यांवरच पाहिलेलं आहे. मी खोटं बोलत नाही आणि कोणावरही खोटे आरोप करत नाही. हे ५० खोक्यांचं सरकार आहे असं वृत्तवाहिनीवर मी ऐकलेलं आहे. ५० खोक्यांचे आमदार किंवा ५० खोक्यांचं सरकार असं जेव्हा म्हटलं जातं, हा अपमान केवळ त्यांचा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. देशातल्या सगळ्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातील आमदार ५० खोके घेतले की बिकाऊ आहेत. हे दुर्दैवं आहे. यामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आपली बदनामी होते असंही त्या यावेळी म्हणाल्या.