विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवायची यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेसकडून शेवटी आज दुपारी नाशिकमधील जागेसाठी सुधीर तांबे यांच्या नावाला मंजूरी दिली. मात्र प्रत्यक्षात सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे सुपुत्र आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे नाव बापाचं फायनल आणि पोराने अर्ज भरल्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील ही तिसरी घटना असल्याचे पाह्यला मिळाले.
सुधीर तांबे हे काँग्रेस विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक आहेत. तर सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे म्हणून ओळखले जातात. अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष असताना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी कोण यावरून विखे-पाटील आणि थोरात यांच्यात रस्सीखेच सुरु होती. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे-पाटील हे आपले पुत्र सुजय विखे-पाटील यांच्यासाठी आग्रही होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी आपले वजन भाचे सत्यजीत तांबे यांच्या पारड्यात टाकले आणि युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी सत्यजीत तांबे यांची वर्णी लागली. त्यानंतर विखे-पाटील पिता-पुत्राने काँग्रेसचा त्याग करत भाजपाचे कमळ हाती घेतले.
यापूर्वी सोलापूरातील काँग्रेसचे बडे प्रस्थ असलेले स्व.बाबूराव चाकोते हे अनेक वर्षे आमदार होते. त्यांच्या अधिपत्याखाली सोलापूरची कृषी उत्पन्न बाजार समितीही होती. मात्र त्यांना त्यांच्या मुलाला आमदारकीला संधी द्यायची होती. विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत बाबूराव चाकोते यांनी तसे पक्षालाही कळविले. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांनाच उमेदवारी दिली. त्यावर बाबूराव चाकोते यांनी आपला उमेदवारी अर्ज मुद्दाम चुकीचा भरत आपले चिरंजीव विश्वनाथ चाकोते यांचा अर्ज योग्य पध्दतीने भरला. उमेदवारी अर्ज छाननीत बाबूराव चाकोते यांचा अज बाद ठरला आणि त्यांच्या मुलाचा विश्वनाथ चाकोते यांचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे काँग्रेसने एबी फॉर्म विश्वनाथ चाकोते यांना दिला आणि पुढे ते आमदार झाले.
त्यानंतर नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक आणि त्यांचे चिरंजीव हे भाजपामध्ये आले. मात्र भाजपाने गणेश नाईक यांना विधानसभेची उमेदवारी नाकारत त्यांचे चिरंजीव डॉ. संजीव नाईक यांना दिली. परंतु चिरंजीव संजीव नाईक यांनी आपली उमेदवारी गणेश नाईकांना दिली. आणि बापासाठी मुलाने माघार घेतली. आणि गणेश नाईक हे निवडूण आले.
त्यानंतर आताचे नाशिकमधील ताजे उदाहरण सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे पिता-पुत्राच्या उमेदवारीचे राजकिय नाट्य हे ही याच पध्दतीत मोडणारे आहे. त्यामुळे नाईक वगळता काँग्रेसच्या मुशीतील बापांनी मुलांच्या भवितव्यासाठी आपली संभावित आमदारकीवर पाणी सोडल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सुधीर तांबे म्हणाले, सत्यजीत तांबे राज्यात जे तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवानेतृत्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे हे या निवडणुकीत हे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला आहे.
फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. सत्यजीत तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही. कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत. काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं, असं मत सुधीर तांबेंनी व्यक्त केलं.