मराठी ई-बातम्या टीम
दोन दिवसापूर्वी येरवडा येथील शास्त्रीनगर भागात इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील माणसे जशी कष्टाची कामे करतात तशी कामे आपल्याकडची करायला तयार होत नाहीत असे वक्तव्य केले.
या इमारतीचं बांधकाम सुरू असून त्यावेळीच स्लॅबची जाळी कोसळून ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी हे सर्व मजूर बिहारचे असून आपल्याकडील लोकं अशी कष्टाची कामं करायला तयार होत नसल्याचे स्पष्ट केले.
सुनिल टिंगरेंनी लक्षात आणून दिले की या ठिकाणी ते काम तातडीने करून द्यायचे असल्यामुळे बिहारची ही टीम दिवसरात्र काम करत होती. त्यांना इथे येऊन ८ दिवसही झाले नव्हते. या मजूरांना कंत्राटावर घेण्यात आलं नव्हते असेही त्यांनी सांगितले.
आपल्या भागातली लोकं अशा प्रकारचे कष्टाची काम करण्यासाठी इतके तयार होत नाहीत, जेवढे मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातली लोकं तयार होतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली १० कामगार अडकले. या अपघातामध्ये अन्य पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली होती.