नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेवार शुभांगी पाटील यांना जवळपास ४३ हजार मतं मिळाली. दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या विजयावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘राष्ट्रवादीने सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली’ अशा आशयाचा गौप्यस्फोट केला. अजित पवार यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होईल, असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, अजित पवारांच्या याच विधानामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाणा आले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले.
पुणे जिल्ह्यातील पोटनिवडणूक लढविण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना विचारले असता प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्यावतीने आमच्या ज्या उमेदवार होत्या त्यांचं काम राष्ट्रवादी पक्षाने केले. मी अजित पवार यांचे विधान ऐकलेले नाही. नाशिक पदवीधर मतदरासंघाच्या निवडणुकीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ही जागा काँग्रेसला दिली होती. मात्र या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरू शकले नाही. त्या जागेवर काँग्रेसच्या नेत्यांच्या पुत्राने अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे या जागेसाठी काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, असा अजित पवार यांच्या विधानाचा अर्थ असावा. या जागेवर आमच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना ४३ हजार मतं मिळाली असे स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या विधानानंतर नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली. अजित पवारांनी चांगला खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्यजित तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केली, अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवारांनी केले. अजित पवार ही एक जबाबदार व्यक्ती आहे. ते अशा पद्धतीने बोलत असतील तर या सगळ्या गोष्टींची चिंता आमच्याही मनात आहे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर याबाबत आम्ही खुलासा करू, असे नाना पटोले म्हणाले.