मुंबईः प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा-शिवसेनेतील युतीला कधीचा मुहूर्त लागणार याची उस्तुकता लागलेली आहे. मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही भाजपाचे अनेक उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास उभे करायचे अशी रणनीती भाजपाने आखल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे. त्यामुळे युतीच्या घोषणेला मुहूर्त मिळत नसल्याची विश्वसनीय माहिती भाजपातील सूत्रांनी दिली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत सातारा येथून भाजपचे नरेंद्र पाटील आणि पालघर मतदारसंघात भाजपाचे राजेंद्र गावीत यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत पालघरची जागा भाजपाला राखता आली. हाच पॅटर्न आता विधानसभेतही राबवण्याचा भाजपाचा मानस असून त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. युतीतील काही जागांची अदलाबदल होण्याची चर्चा जरी सुरू असली तरी भाजपच्याच उमेदवारांना शिवसेनेतून लढविण्याचा विचार पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा आहे. अशाच पध्दतीने मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जात आहे. मात्र त्याच जागेवरून भाजपाचा संभावित उमेदवार हा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर होताच सर्व पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी जोरदारपणे सुरू झाली आहे. ज्याप्रमाणे सातारा आणि पालघरमध्ये भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढले होते त्याचप्रमाणे दादर- माहिम , वडाळा मतदारसंघासह अन्य काही मतदारसंघातही भाजपाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार आहे. युतीतील या नव्या फॉर्मुल्यामुळे युतीच्या जागा वाढण्याचीही संधी निर्माण होणार असल्याने या भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु यातील अनेक जागांवर भाजपाच्या उमेदवारांना शिवसेनेतून उमेदवारी देण्यास सेना नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या अंतिम बोलणीवर शिक्कामोर्तब होत नसल्याने या बोलणी लांबत आणि युतीची घोषणा लांबणीवर पडत चालल्याचे त्यांनी सांगितले.
Tags bjp cm fadnavis shivsena uddhav thackeray
Check Also
मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही
लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …