Breaking News

फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंनी कधीही अयोध्येला जावं त्यांच स्वागत होईल संजय राऊतांनाही लगावला टोला

अयोध्या दौरा जाहिर केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरे यांना दिला. तसेच राज्य ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागायची नसेल तर त्यांनी महंत आणि साधूंची मागावी, जर त्यांचीही मागायची नसेल तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मागावी आणि त्यांचीही माफी मागायची नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मागावी. नसेल तर जे काही झालंय ते चुकीचे झालेय आणि पुन्हा होणार नाही असे स्पष्टपणे सांगावे आम्ही त्यांचे स्वागत करू असा अल्टीमेटम दिला.
ब्रिजभूषण शरण सिंग यांनी सातत्याने राज ठाकरे यांना इशारा देवूनही मनसेचा कोणताही नेता त्यास प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांनीही यासंदर्भात अधिकृत प्रवक्त्याशिवाय कोणीही बोलण्याचा शहाणपणा करू नये असा सज्जड दम मनसैनिकांना दिला. मात्र मनसेकडून कोणीच बोललं नाही. त्यामुळे अखेर पायाचे कारण पुढे करत राज ठाकरे यांनी आज अयोध्येचा दौरा आज स्थगित करत असल्याचे जाहिर करून टाकले.
तसेच यासंदर्भात २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं असताना त्यासंदर्भात राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाजपाची भूमिका स्पष्ट केली.
देवेंद्र फडणवीसांनी आज इंदापूरातील नृसिंह मंदिराला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून टोला लगावला. सहकार्य हवं असल्याचं सांगितलं असतं तर अयोध्येला जाण्यासाठी आम्ही सहकार्य केलं असतं असं संजय राऊत म्हणाले होते. यावरून फडणवीसांनी प्रतिटोला लगावला आहे.
संजय राऊत हे काही महत्त्वाची व्यक्ती नसल्याचे सांगत ते सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात. गेले तर कशासाठी गेले, नाही केले तर का नाही गेले? असे विचारतात. त्यामुळे अशा व्यक्तीला मी उत्तरं देत नसतो असे सांगत राऊतांना टोला लगावला.
तर राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मला वाटतं राज ठाकरेंनी दौरा पुढे ढकलला आहे, रद्द केलेला नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे, की जो रामभक्त अयोध्येला जाईल, त्याचं स्वागतच झालं पाहिजे. त्याला अडवणं चुकीचंच आहे. ते जेव्हाही जातील त्यावेळी त्यांचं स्वागतच होईल.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *