मुंबई : प्रतिनिधी
भाजपला मराठावाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. परंतु या नेत्याच्या माध्यमातून पक्षाच्या पदावर तर कधी सरकार दरबारी कामे करून घेण्यासाठी फिरणाऱ्या आताच्या भाजप वरिष्ठ नेत्यांना मुंडे यांच्या जयंती दिनीच त्यांचा विसर पडला आहे. केवळ प्रदेश कार्यालयातील काही मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्व.मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मुंबईतच असूनही या कार्यक्रमाला उपस्थित राहीले नाहीत.
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त आज भाजपच्या प्रदेश कार्यालयात आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष अँड.आशिष शेलार आणि दस्तुरखुद्द स्व.मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यापैकी कोणीही हजर राहीले नाही. मात्र या नेत्यांनी ट्विटरवरून आदरांजली वाहण्यात धन्यता मानली.
भाजपचे आणखी एक नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या जयंती दिनी आणि स्मृतीदिनी सुरुवातीला काही वर्षे भाजपचे सर्व नेते झाडून उपस्थित रहात होते. मात्र त्या कार्यक्रमालाही आता कोणी उपस्थित रहात नाही. त्यामुळे भाजपचा कोणताही लोकमान्य पावलेल्या नेत्याला त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा डुंकूनही पहायचे नाही असा शिरस्ता तर नाही ना ? असा सवाल भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होत असल्याची भावना भाजप प्रदेश कार्यालयात नियमित जाणाऱ्या एका कार्यकर्त्यांने बोलून दाखविली.
महाराष्ट्राचे लोकनेते व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजपा नेते अतुल शहा यांच्यासह मुकुंद कुलकर्णी आणि काही निवडक कार्यकर्त्ये उपस्थित होते.