राज्यात सत्तांतर होवून जवळपास एक महिना उलटून गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचे नियमित पावसाळी अधिवेशन घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती अर्थात बीएसीची बैठक उद्या बोलाविण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या समारोपावेळी पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ रोजी घेण्याचे निश्चित केले होते. परंतु तत्पूर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सुरुवातीला ३० नंतर १० असे मिळून ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकाविले. त्यामुळे २८ जूनलाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ३० जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
त्यानंतर विधिमंडळानेही नियोजित १८ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन रद्द करण्यात आल्याचे सांगत त्यासंदर्भात पुढील तारीख जाहिर करणार असल्याचे जाहिर केले. दरम्यानच्या काळात बहुमत चाचणी सिध्द करण्यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यपालांच्या आदेशानुसार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनानंतर नियमित अधिवेशन कधी होणार याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत होती. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत होती.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्यासाठी उद्या ९ तारखेला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तारखेवर शिक्का मोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र १० तारखेपासून विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीचे हेच ते पत्र