राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सातत्याने सुरु होती. अखेर राज्य सरकारला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर याबाबत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरुवातीला दिवाळीनंतर असे जाहिर केले त्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी असे सांगण्यात आले. मात्र आता हिवाळी अधिवेशन संपून एक महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्ताराची लक्षणे दिसेनासे झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी थेट शिंदे-फडणवीसांना उद्देशून मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही असा थेट सवाल केला.
तसेच जनतेची कामे खोळांबू लागल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा अशी आग्रही मागणी करत याप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
बच्चू कडू हे आज एका वृत्तवाहीनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सवाल केला.
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरही भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, विधान परिषद निवडणुकीचा निकाल भाजपा आणि शिंदे गटाला धक्का देणारं होता, असं म्हणता येणार नाही. कारण पाचपैकी एक जागा भाजपानं जिंकली आहे. आणि एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे. तर उर्वरित जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.
हे एकूण मतदान पाहिलं तर ते दोन लाखांच्या वरही जात नाही. एकंदरीत दोन ते अडीच लाख मतं आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीवरून लोकांचा सरकारवर रोष होता, त्याचेही काही दुष्परिणाम या निवडणुकीत दिसले. पण याचा परिणाम इतर निवडणुकीवर पडेल असं काही दिसत नाही. जशी निवडणूक बदलते, तसे उमेदवार आणि निकालही बदलत असतात, हा आतापर्यंत सगळ्यांचा अनुभव आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, मला वाटतं मंत्रिमंडळाचा विस्तार केला पाहिजे. मला मंत्री करा, असं मी बिलकूल म्हणत नाही. यापूर्वीही मी यावर स्पष्ट सांगितलं आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार का केला जात नाही? याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तार का केला जात नाही, हे किमान त्या ५० आमदारांना तरी सांगितलं पाहिजे. हे मूळ कारण आहे, यामुळे आम्ही विस्तार करत नाही. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने जनतेची कामं खोळंबू लागली आहेत.