पुणे शहरातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून भाजपा- शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यावेळी पहायला मिळणार आहे. या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच या दोन्ही मतदारसंघासाठी उद्या उमेदवार जाहिर करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई हे उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पुणे शहरातील कसबा पेठ तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही मतदार संघात निवडणूक न घेता ती बिनविरोध व्हावी असा प्रयत्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील करीत होते. मात्र महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे या निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षकाडून उमेदवार उतरविण्याची तयारी सुरु झाली असली तरी कोणती जागा कोण लढविणार यावर अद्याप एकमत झालेले नाही आज आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत संपन्न झाली मात्र आघाडीतील शेकाप आणि समाजवादी पार्टी आदी अन्य घटक पक्षासोबत चर्चा केल्यानंतर उद्या याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तर नासिक बाबत संभ्रम निर्माण झाला असे सांगून पाटील म्हणाले की,शिक्षक आणि पदविदर मतदारांनी भाजपाला नाकारल्याचे चित्र आहे तर कोकणात धन शक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते सुभाष देसाई आदी नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.