Breaking News

मंत्र्यांनंतर आता त्यांचे डिएलओं आणि कर्मचाऱ्यांना होतेय कोरोनाची लागण तीन ते चार जण सध्या प्रकृती अस्वास्थामुळे घरी

मराठी ई-बातम्या टीम

राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातही आता हळूहळू कोरोना आणि ओमायक्रॉनचा शिरकाव होताना दिसत आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कामकाज आणि निर्णयाला प्रसिध्दी मिळावी यासाठी राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातील डिएलओंची नियुक्ती करण्यात येते. राज्य सरकारमधील जवळपास १० मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या डिएलओंनाही लागण होत असल्याचे माहिती पुढे येत आहे.

आतापर्यंत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह १० जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.  माहिती व जनसंपर्क विभागातील जवळपास तीन डिएलओंचे अहवाल आतापर्यंत पॉझिटीव्ह आले असून हे तिघेही सध्या घरी राहुन उपचार घेत आहेत. आतापर्यत कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या डिएलओमध्ये एक शिक्षण मंत्री, महसूल मंत्री आणि अन्य एका मंत्र्याचा डिएलओ असल्याचे समजते. तर काल जवळपास चार ते पाच जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यालयातून तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेल्याची माहिती विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

त्यामुळे मंत्र्यांशी संबधित असलेल्या डिएलओंनाही आता कोरोनाची लागण होत असल्याने ते काम करत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागातील इतरांनाही संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय मंत्रालयातील महसूल विभागातील अनेकांनाही आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येत असून जवळपास ७ ते ८ जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी मंत्रालयाच्या तिन्ही प्रवेशद्वारावर मंत्रालयात प्रवेश करणाऱ्याचे तापमान तपासले जात होते. त्यामुळे एखाद्याचे तापमान नॉर्मल पेक्षा जास्त असेल तर त्यास प्रवेशद्वारावरूनच परत पाठवले जात होते. परंतु मध्यंतरीच्या काळात रूग्णसंख्येत घट आल्याने ही पध्दत बंद करण्यात आली. परंतु आता मंत्रालयात येणाऱ्यांचे तापमान तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

पूर्वीप्रमाणे तपासणी सुरु केल्यास मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होणार नाही किंवा त्यांना झालेली असेल तर त्याचा संसर्ग इतरांना होणार नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच मंत्रालयात येणाऱ्यांचे तापमान तपासले जावे अशी मागणीही आता मंत्रालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *