मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाझ जलील यांनी तिन्ही पक्षांना दिल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी तर एमआयएमसोबत आघाडी शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, एमआयएमने महाविकास आघाडी सोबत युती करण्याचा प्रस्ताव दिलेला असल्याचे मी कुठे तरी वाचलं, राज्यापुरते अशा पध्दतीने आघाडी करण्याचे किंवा युती करण्याचे अधिकार पक्षाच्या राष्ट्रीय समितीने अद्याप राज्याला (राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र कार्यकारणीला) दिलेले नाहीत. जर राज्याला असे अधिकार घ्यायचे असतील तर आधी राष्ट्रीय समितीने परवानगी दिली पाहिजे असे सांगत एमआयएमसोबत युती होवू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
अशा पध्दतीची युती राष्ट्रीयस्तरावर करायची की राज्य स्तरावर करायची याबाबत असा कोणताही प्रस्ताव अद्याप आमच्यापर्यत आलेला नाही. आणि फक्त राज्यापुरती युती करायची असेल तर तसे अधिकार राज्य समितीला देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच सध्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून दोन समुदायात दुफळी आणि तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र केंद्र सरकारने अशा पध्दतीची दुफळी तेढ निर्माण होणार नाही या अनुषंगाने प्रयत्न करायला हवेत. मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, काल एमआयएमने महाविकास आघाडीसोबत युती करण्यासंदर्भातील वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एमआयएम ही भाजपाची बी टीम नसल्याचे सिध्द करावे लागेल असे वक्तव्य करत ते धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवून द्यावे लागेल. आणि तसे त्यांनी औरंगाबादच्या निवडणूकीत दाखवून द्यावे लागले. त्यानंतर त्यांच्या प्रस्ताव समजून घेतल्यानंतर त्याबाबत बोलता येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी असे समविचारी पक्ष जर भाजपाच्या पराभवासाठी एकत्र येवू इच्छितात तर चांगलेच आहे. मात्र धर्मनिरपेक्ष असायला हवेत असे सांगत त्यांचा नेमका काय प्रस्ताव आहे हे समजून घेतल्यानंतर त्याबाबत अधिक बोलता येईल असे स्पष्ट केले. तर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकविणाऱ्यांसोबत युती शक्य नसल्याचे सांगत हा भाजपाच्या कटाचा भाग असल्याचा आरोप आज केला.