मुंबई: प्रतिनिधी
जवळपास तब्बल दिड वर्षानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उद्या सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त मंत्रालयात येणार आहे. तसेच मागील दोन आठवड्याहून अधिक काळ त्यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांना सोमवारीच रूग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास सहा महिन्याच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री मंत्रालयात येणार आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पदभार स्विकारण्यासाठी आणि त्यानंतर कोकणसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यानंतर पर्जन्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पहिल्यांदा मंत्रालयात आले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मंत्रालयात येणार आहेत.
मागील दिड वर्षात कोरोनाचा कार्यकाळ असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात येणे टाळले होते. मात्र राज्याचा कारभार हाकण्यासाठी त्यांनी शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी तर कधी सह्याद्री अतिथीगहात बैठकांचे आयोजन करत राज्याचे कारभार हाकला. त्यांच्या या गोष्टीवरून विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला शिरस्ता सोडला नाही. उलट विरोधकांना मंत्रालय किंवा घराबाहेर पडण्यापेक्षा एकाच ठिकाणी बसून सबंध राज्यातील यंत्रणेशी संपर्क साधून राज्याच्या हिताची कामे करणे केव्हाही चांगले असे सुणावत विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न केला.
मधल्या काळात त्यांचे सुपुत्र तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागणही झाली. त्यामुळे तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बाहेर येणे जाणे आणखीनच टाळले. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा जोर थोडासा कमी झाल्यानंतर त्यांनी नागपूर मुंबई दरम्यान होत असलेल्या महामार्गाची पाहणीही केली. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. परंतु मंत्रालयात येणे टाळले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षेही पूर्ण झालेली आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होत असून ही बैठक मंत्रालयातील नेहमीच्या सात मजल्यावरील मंत्रिमंडळ सभाग्रहात होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री खरेच मंत्रालयात येणार की पुन्हा ऑनलाईन उपस्थिती लावणार हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे.