Breaking News

पंतप्रधान पदावरच्या माणसानेसुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकावीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा खोचक सल्ला

औरंगाबाद – कन्नडः प्रतिनिधी
पंतप्रधान हे पद देशाच्या इज्जतीचं पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होवू देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.
सत्तेवर आल्यावर सर्व समाजघटकाला न्याय देणं हे तुमचं कर्तव्य होते. परंतु आज कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांवर खटला दाखल केला जात आहे. यासाठी तुम्हाला सत्ता दिलीय का? सत्तेचा गैरवापर होत आहेत. ठिकठिकाणी आम्ही बघत आहोत विरोधकांवर खटला भरला जात आहे. काँग्रेस पक्षाचा आवाज बंद करायची पावले ते टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला.
३७१ कलमामुळे नागालॅंड, मेघालय, अरुणाचल, सिक्कीम येथे आपल्याला जमिन घ्यायचा अधिकार नाही. त्यामुळे देशात ३७० किंवा ३७१ हा प्रश्न नाहीय. तर माझ्या शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते, त्यावेळी त्यांनी सत्तेवर आल्यावर कपाशीला ७ हजाराचा भाव देवू असे सांगितले होते. दिला का ? असा सवालही त्यांनी केला.
कपाशीला भाव द्या , बाजरीला भाव द्या , मक्याला भाव द्या म्हटलं तर ३७० सांगितले जाते…नोकरी… बेरोजगारी बाबत बोललो तर ३७० सांगितले जाते… काय करावं या लोकांचं… हे लोक रात्री झोपेतही ३७० बडबडत असतील असा टोलाही त्यांनी लगावला.
जळगावला पंतप्रधान आले होते. त्यावेळी ३७० बद्दल तुमचं काय मत आहे असं मला विचारलं होतं. चला माझा पाठिंबा आहे… पण काय फरक पडणार आहे का. आम्ही साथ दिली. त्यावेळी आम्ही काश्मीरमधील लोकांना विश्वासात घ्या, म्हणजे दुसर्‍या देशातील लोक गैरफायदा घेणार नाही असा सल्ला सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिला होता. मात्र आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला हे सांगत असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान व अमित शहा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेले की, त्यांच्या तोंडात एकच नाव शरद पवार… काय करावं यांच सांगा… मी या देशात काय केलं हे देशातील जनतेला माहित असल्याचे त्यांनी सांगितले.
कन्नडची पंचायत समिती आहे, त्यात महिला आहेत. त्यांना ५० टक्के आरक्षण कुणी दिले. मंडल आयोगाचा निर्णय झाला त्यावेळी देशात दंगली झाल्या. परंतु महाराष्ट्रात तो एकमताने राबवला गेला. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो याची आठवण प्रश्न विचारणा करणार्‍या अमित शहा यांना त्यांनी करुन दिली.
आज कन्नड हे राज्यातील सर्वात खराब रस्ते असलेलं शहर म्हणून ओळखलं जात आहे. या भागाचा विकास करण्यासाठी एक अनुभवी व्यक्तीमत्व निवडून येणं गरजेचं आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते विभाग न सुधारण्याची त्यांची रणनीती असेल तर त्यांना बाजूला हटवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *