राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडी कोठडी संपत आल्याने त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २३ फेब्रुवारीला मनी लॉडरींग प्रकरणी ईडीने ताब्यात घेवून ९ तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला ३ मार्च पर्यंत तर नंतर ७ मार्च पर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज ईडी कोठडीची मुदत आज संपत आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली.
२० वर्षापूर्वी कुर्ला येथील भूखंड खरेदी केल्याप्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हिची बहिण हसीना पारकर हिला ५ लाख रूपये देण्यात आल्याचा आणि १९९३ बॉम्बब्लास्ट प्रकरणातील सलीम पटेल यांच्याकडून हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती आणि त्याच दिवशी त्यांना आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. सकाळी ६ वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांची प्रदीर्घ चौकशी झाली. चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपाकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यानही भाजपाने मलिक यांच्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधात घोषणाबाजी केली. मलिकांच्या अटकेच्या १३ दिवसांनंतरही महाविकास आघाडी सरकारने त्यांचा राजीनामा घेतलेला नाही विशेष. मात्र आंदोलन करून थकलेल्या भाजपाने अखेर मलिकांच्या अटकेकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.