मुंबई : प्रतिनिधी
सर्व सणवार निर्विघ्न पार पडलेले आहेत. मात्र आता नव वर्षाच्या स्वागताची तयारी प्रत्येकाकडून करण्यात येत आहे. नव वर्षासाठी तुम्हाला आतापासूनच शुभेच्छा पण या काळात गर्दी होवून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी युरोपमध्ये जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला तसा आपल्याकडे लागू करावा यासाठी अनेक सूचना आल्या आहेत. दिवसा नाही तर किमान रात्रीचा तरी लॉकडाऊन लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागू करणार नसल्याचे सांगत राज्यातील ७० टक्के लोक स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की लस आली तरी मास्क परिधान करावा लागणार आहे. लस येणार की नाही याचा पत्ता नाही. पण जरी लस आली तरी सहा महिने मास्क परिधान करावा लागणार आहे. युरोपात कोरोना विषाणूने आपले स्वरूप बदलले असून आता पूर्वीपेक्षा जास्त वेगाने तो पसरत आहे. त्यामुळे आपण अजूनही धोक्याच्या वळणावर असून आपणाला काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.