Breaking News

काँग्रेस आऊट ?…जयंत पाटलांचे शिवसेनेबरोबरील युतीचे स्पष्ट संकेत ... तर महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते

मुंबई: प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने ‘सामना’ ने मत व्यक्त केले आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यावर ‘सामना’ मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढतील असे छापून आल्याचा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटील यांनी केला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील. प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे. निवडणूका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करु शकतील, पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आता निवडणुका नाहीत. त्यामुळे यावर रोज चर्चा कशाला करायची. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी नक्कीच चर्चा करु. ज्यावेळी निवडणूका होतील त्यावेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन चर्चा होईल असेही ते म्हणाले.

 देशातील रामभक्तांनी अराजकीय एक समिती तयार करावी – पाटील

राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी असे आवाहन त्यांनी करत राममंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार आणि शिवसेना आणि भाजप यांच्यात बुधवारी झालेल्या हाणामारीचा मुद्दा पत्रकारांनी विचारला असता  त्यांनी वरील आवाहन केले.

दरम्यान या समितीने कायम राम मंदिर उभारणीतील खर्च, जमाखर्च आणि त्याचा हिशोब हा त्रयस्थ बॉडीने निरीक्षणाखाली ठेवावा कारण रामभक्तांकडे रामभक्तांची अपेक्षा आहे की, प्रामाणिकपणे मंदिराचं पावित्र्य राखून राम मंदिर उभं राहावं. अतिशय भक्तिभावाने राममंदिर उभे व्हावे अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे म्हणून रामभक्त मोठ्या प्रमाणावर निधी देत आहेत. मात्र राममंदिर उभारणीत गोळा होणार्‍या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.

राम मंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे यानिमित्ताने समोर आल्याची टीकाही त्यांनी भाजपाचे नाव न घेता केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *