मुंबई : प्रतिनिधी
नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून लवकर त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे देशभर अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यात येतील अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
आज बांद्रा येथील अलीयावर जंग इन्स्टिट्यूट येथे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते आज दिव्यांग बाळांसाठी अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटरचे उदघाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमास रामदास आठवले अलीयार जंग येथून व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटरची माहिती दिली.
देशात आज मितीस एकूण २ करोड ६७ लाख दिव्यांग जनांची संख्या आहे. देशात अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू झल्यानंतर नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून त्यावर त्वरित उपचार केले जातील. त्यामुळे भविष्यात दिव्यांग मुलांना होणारी पीडा अधिक होणार नाही. त्यासाठी सर्व पालकांनी आपल्या नवजात बाळांची अर्ली ईंटर्व्हेन्शन सेंटर मध्ये तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
लवकर उपचार मिळाल्यास दिव्यांगता दूर करून बाळ सदृढ सक्षम होऊ शकते. त्यातून दिव्यांग जनांची वाढती संख्या कमी होत जाईल. त्यासाठी अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर महत्वपूर्ण आहेत असेही ते म्हणाले.