मुंबई: प्रतिनिधी
दूरदर्शनच्या मोनपलीच्या काळात सृष्टी से पहले कुछ असत असा वेगळ्याच ताल स्वरात एक गायन ऐकायला यायचे. भारत एक खोज या स्व.पंडित नेहरू यांच्या पुस्तकावर आधारीत मालिकेची सुरुवात व्हायची आणि या संगीतामुळेच पाहणाऱ्या प्रत्येक दर्शकाचे लक्ष त्या संपूर्ण टि.व्ही.वर केंद्रीत व्हायचे. या पध्दतीचे वैशिष्टपूर्ण संगीताच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टी, दूरचित्रवाणी मालिकांना एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवणारे ख्यातनाम संगीतकार, पार्श्वसंगीतकार वनराज भाटीया यांचे आज वार्धक्यामुळे निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. भाटीया यांना आपल्या अनोख्या संगीतामुळे राष्ट्रीय अवार्ड मिळालेला असून संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
वनराज भाटीया यांनी अंकुर, ३६ चौरंगी लेन, जाने भी दो यारों, मोहन जोशी हाजीर हो, तरंग, खामोश, पेस्तोनजी, हिप हिप हुर्ये, सुरज का साँतवा घोडा,पिता या चित्रपटांचे संगीतकार म्हणून काम केले. तर तमस, खानदान, यात्रा, वागळे कि दुनिया, बनेगी अपनी बात, भारत एक खोज आदी दूरचित्रवाणी मालिकांना त्यांनी संगीत दिले. तर अजुबा, दामिनी, परदेस, घातक, बनगरवाडी, चायना गेट यासह असंख्य चित्रपटांना भाटीया यांनी पार्श्वसंगीत दिले.
भाटीया यांच्या निधनाचे वृत्त कळताच जावेद अख्तर, फरहान अख्तर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. भाटीया हे एकटेच रहात होते. मागील काही वर्षापासून ते आर्थिक अडचणींचा सामना करत करत होते. त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त कळताच जावेत अख्तर यांनी वनराज भाटीया यांना आर्थिक मदत करण्यासाठी एक मोहिम राबविली. त्यातून चांगली आर्थिक मदत भाटीया यांना उपलब्ध करून दिली.