काही वर्षांपूर्वी अभिनेता संजय दत्त आणि कुमार गौरव यांचा ‘नाम’ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात उमेदवारीच्या काळात गझल गायक पंकज उधास यांनी “चिठ्ठी आई है” ही एक गझल गायली. चित्रपटाच्या यशात पंकज उधास यांनी गायलेल्या गझलचाही चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि कथेच्या बरोबरीने वाटा होता. या गझल मधील शेवटच्या तिसऱ्या अंतराच्या तिसऱ्या-चवथ्या ओळीत “…खत्म हुआ ये खेल भी अब तो…” त्यांनी एक कवडे गायले होते. त्या ओळीतील भावना आज इतक्या वर्षानंतर ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्याबाबत आणि त्यांच्या कुटुंबियासह, लाखो चाहत्यांच्यासोबत तंतोतंत लागू झाल्याचे दिसून आले.
वयाच्या ७२ व्या वर्षी ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे ब्रीचकॅण्डी रूग्णालयात निधन झाल्याची माहिती त्यांची मुलगी नायाब उधास यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना दिली.
देशातील तरूण पिढी जी ८० च्या दशकात होती ती आता चाळीशी पार झाली. त्या काळात “चांदी जैसा रंग हे तेरा, चांदी जैसे बाल” सारख्या अजरामर गझल गायकी ऐकत त्यावेळच्या तरूणाईला वेड लावले. त्यानंतर नाम चित्रपटातील “चिठ्ठा आई है” या गझलने तर त्यावेळी नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने घरदार सोडून परराज्यात-परदेशात राहणाऱ्या अनेक तरूणांना भावनिक करत कुटुंबियांप्रती अश्रु ढाळायला लावले. त्यानंतर त्यांचे अनेक गझल अल्बम प्रकाशित झाले. मात्र तितकी लोकप्रियता आणि अजरामरता इतर गझल गायकीला मिळाला नाही. परंतु पंकज उधास यांच्या गझल गायकीमुळे त्यांचा एक विशिष्ट वर्ग निर्माण झाला. या वर्गासाठीच खास त्यांच्या गझल होत्या की काय असा प्रश्न निर्माण मध्यंतरीच्या काळात निर्माण झाला होता.
मागील काही दिवसांपासून पंकज उधास यांना आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांना ब्रीचकॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त कळताच हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. पंकज उधास यांच्या कन्या नायाब उधास म्हणाल्या की, मागील १० दिवसापासून पंकज उदास यांच्यावर उपचारावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत आज मालवली. त्यांच्यावर उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही सांगितले.