राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर फुटीर गटाचे नेतृत्व अजित पवार यांनी करत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बहुसंख्य आमदार आणि काही खासदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वैयक्तिक नातेसंबध असूनही राजकिय तणाव निर्माण झाला. यापार्श्वभूमीवर आगामी काळात अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यातही घुसखोरी करण्यास सुरुवात करत स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे.
परंतु मधल्या काळात शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रितरित्या एकाच मंचावर आल्याने अजित पवार यांच्या बंडखोरीमागे शरद पवारच असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळ कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये दोन्ही पवारांचा पक्ष एकच असल्याची चर्चा आजही चांगलीच चर्चिली जात आहे.
यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आपला राजकिय अजेंडा अधिक स्पष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला आणि बारामती मधील त्यांच्या समर्थकांसाठी जाहिर पत्र लिहिले. या पत्रात सत्तेतील भाजपासोबत का गेलो यासंदर्भात सविस्तर भूमिका या जाहिर पत्रात मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच… pic.twitter.com/3fIlE1DFQU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 25, 2024
तर अजित पवार यांच्या जनतेसाठी लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार गटाने सत्तेत जाऊनही जनता प्रतिसाद देत नसल्याची टीका केली.
सत्तेत जाऊन देखील जनता प्रतिसाद देत नाही या जाणिवेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जनतेला खुले पत्र लिहिल.
राजकारणात आल्यानंतर खासदार,आमदार, मंत्री, अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद हे सन्माननीय शरदचंद्र पवारांमुळे मिळालं हे पत्रामध्ये लिहिण्याचं धाडस अजितदादा दाखवू शकले नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.
जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी हे त्यांचं वाक्य पूर्ण पणे चुकीच आहे. हे वाक्य जर खरं असतं तर ८४ च्या निवडणुकीत भाजपमधून निवडून आलेले दोन खासदार एके पटेल व जंगा रेड्डी यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलं असतं आणि तुम्ही लिहिलेला डायलॉग मारला असता. परंतु तसं झालं नाही आणि देशभरात आजही अनेक लहान-मोठे पक्ष विरोधामध्ये कार्यरत आहेत याची आठवण महेश तपासे यांनी करून दिली.
आपण सत्तेमध्ये जनतेच्या भल्यासाठी सामील झालो हे अगदी महाराष्ट्राला न पटणार कारण तुम्ही दिलं. संविधान रक्षणाचे जे संघर्षमय कर्तव्य माननीय पवार साहेब पार पडत आहेत अशा वेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे राहिला हवे होत, अगदी हे कर्तव्य देखील तुम्ही विसरलात असेही तपासे पुढे म्हणाले.