मुंबईः प्रतिनिधी
मान्सूनचा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हेक्टरी ८ आणि १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. मात्र ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८० लाख रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. या मदतीचे वाटप १२ डिसेंबर २०१९ रोजी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
साधारणतः तीन-चार महिन्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही भागात आलेल्या पुरामुळे पुरग्रस्तांना मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकट्या बारामती तालुक्यातून एका दिवसात २ कोटी रूपयांची मदत गोळा केली. तसेच ही मदतीची रक्कम पुरग्रस्तांना दिली.
अगदी त्याचधर्तीवर शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही मदत जमा करण्यात येणार आहे. या मदत निधीसाठी पक्षाचे विधानसभेतील आणि विधान परिषदेतील प्रत्येक आमदाराकडून प्रत्येकी १ लाख रूपये जमा करण्यात येणार आहे. तर पक्षाच्या प्रदेश, युवक आणि महिला प्रदेश कार्यकारणीकडूनही स्वतंत्ररित्या ही मदत जमा करण्यात येणार या सर्वांकडून तब्बल ८० लाख रूपयांचा निधी जमा करून तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले असले तरी हे सरकार अद्याप स्थिर झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळेच राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत जाहीर करून तीचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची आणि नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Tags ajit pawar chhagan bhujabal jayant patil nawab malik ncp sharad pawar
Check Also
नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली
जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …