Breaking News

प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतोः महाराष्ट्रात “काय द्याचं” बोला राज्य भाजपाच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत आघाडी सरकारवर घणाघात

मुंबई: प्रतिनिधी
आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या आयोजित बैठकीच्या समारोपावेळी ते बोलत होते.
राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी सुरु असून महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामी नाही, त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावतीत जे घडले ती कोणती घटना नाही तर एक प्रयोग आहे. सावध व्हा. त्रिपुरात काय झाले? २६ ऑक्टोबरला बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्रिपुरात रॅली. २८ ऑक्टोबरला फेक न्युज फॅक्टरीचे काम सुरू झाले. मात्र त्रिपुरा पोलिसांनी कारस्थान उघड केले. ८ नोव्हेंबरला राहुल गांधीचे ट्विट आले आणि मग प्रयोग सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
हा हिंसाचार सरकार समर्थित होता असा आरोप करत अमरावतीत SRP च्या ७ तुकड्या होत्या. पण त्यांना कोणते आदेश दिले गेले नाही. आझाद मैदानात जे झाले तो सेम पॅटर्न होता. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. आमचे पोलिस काय मार खाण्यासाठी आहेत आहे का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
विचारांचा नक्षलवाद आता नाही. आता तो दहशतवाद्यांशी निगडित असून भाजपाचा कार्यकर्ता कधीही दंगल करीत नाही. पण कुणी अंगावर आले तर सोडणार नाही.
आम्ही सर्वसमावेशकतेचे राजकारण करतो, पण लांगूलचालन करीत नाही. लांगूलचालन करणाऱ्या शक्तींना वाटत असेल की आता आपले सरकार आहे, तर आपण काहीही करू. पण भाजपचा कार्यकर्ता असे होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. पण महाराष्ट्र मात्र काहीच करायला तयार नाही. हे म्हणतात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना असा उपरोधिक सवाल करत छोटी-छोटी राज्य रडत नाही तर लढतात. महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात. बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GST चे रडगाणे गात असल्याचा टोला त्यांनी लागवला.
अर्थव्यवस्था, लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे लसीकरण अतिशय आवश्यक होते. हे सोपे काम नव्हते. पण ते भारताने करून दाखविले. या महाविकास आघाडी सरकारने सर्वांसोबत विश्वासघात केला आहे. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे. जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आल्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *