मुंबई : प्रतिनिधी
मागील दोन महिन्याहून अधिक काळ केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमावर्ती भागात आणि संबध भारतात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत देशातील मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार चिडीचुप असताना अमेरिकेतील जगविख्यात गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाची बातमी ट्विट करत आपण यावर का बोलत नाही? असा सवाल मोदी सरकारबरोबरच सर्वच सिनेसृष्टी कलावंताना आज केला.
विशेष म्हणजे जागतिकस्तरावर वृत्तांकन करणाऱ्या एका प्रसिध्द संकेतस्थळावर दिल्लीतील आंदोलनाची प्रसिध्द झालेली बातमी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला.
देशातील काही राज्यांमध्ये विशेष कर्नाटक, तामीळनाडू, केरळ राज्यात भाषिक, पाणी प्रश्नावरून आंदोलन सुरु झाल्यानंतर येथील सिनेसृष्टीतील प्रतिथयश कलावंत त्या त्या राज्यांच्या बाजूने आंदोलनात सहभागी होतात. महाराष्ट्रातही भाषिक मुद्यांवर अनेक मराठी कलावंत पुढे येवून मुंबई महाराष्ट्राच्या बाजूने मुद्दे मांडतात. परंतु आता केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सबंध देशभरातच आंदोलन सुरु असताना पंजाबमधील काही तुरळक कलावंत वगळता मराठी, हिंदी चित्रपट क्षेत्रातील कलावंत शांत आहेत. विशेष म्हणजे बॉलीवूडमध्ये अनेक पंजाबी अभिनेते, चित्रपट निर्माते आघाडीचे आहेत. त्यामुळे अमेरिकेतील सुप्रसिध्द गायिका रिहाना हिने उपस्थित केलेला प्रश्न कदाचित त्याच अनुषंगाने खुप काही बोलून गेल्याचे दिसून येते.
why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S
— Rihanna (@rihanna) February 2, 2021