मुंबईः विशेष प्रतिनिधी
अर्थसंकल्पावर अनेक सदस्यांनी आपली मते मांडली. या मतांची दखल घेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे मुद्दे मांडणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या चर्चेवरील उत्तरात फक्त राजकिय मुद्यांचीच उत्तरे असल्याची टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत पवार यांच्या भाषणाने भ्रमनिरास झाल्याचे सांगत भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिल्यानंतर राईट टू रिपाल्य खाली सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनची करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने कोणती उपाययोजना करण्यात येत आहे, राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे, त्यावर कोणता तोडगा काढला जात आहे, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याची घोषणा केली होती त्याचे काय, उद्योगातील गुंतवणूक वाढविण्याच्या अनुषंगाने सरकार काय करणार यासह अनेक प्रश्नांवर उत्तरे अपेक्षित होते. मात्र अर्थमंत्र्यांच्या भाषणात फक्त राजकिय मुद्देच असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याकडे विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जयंत पाटील हे गंमत करण्याच्या मूड आहेत. मात्र आम्ही नाही असे सांगत जयंत पाटील यांच्या बोलण्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले.
त्यांच्या भाषणात काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांच्या तोंडी असलेले वक्तव्य माझ्या तोंडी घालण्याचा हा काय प्रकार असा सवाल करत यासंदर्भात आपण हक्कभंग आणणार असल्याचा इशारा दिला. तसेच विधानसभाध्यक्षांनी हक्कभंग समिती तयार केली नसल्याने हक्कभंग आणण्यावर आम्हाला मर्यादा पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
उध्दवजी तुमच्या पक्षाचे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण आहे. मात्र अर्थमंत्र्यांनी चुकीला माफी नाही म्हटल्यावर तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तुमचा चेहरा काय सांगायचे ते सांगत होता. मला चेहऱ्यावरचे भाव लगेच कळतात असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कृतीचे त्यांनी स्वागत केले. मात्र या चर्चेत अर्थमंत्र्यांनी भम्रनिरास केल्याने आम्ही सभात्याग करत असल्याचे जाहीर करत भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवारांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेत कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी एक रूपयाचाही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही देत राज्यातील कोणत्याही समाजाच्या घटकांवर अन्याय होवू देणार नसल्याचे आश्वासन दिले.