मुंबईः प्रतिनिधी
राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात शिकाँरा महाआघाडी सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. तत्पूर्वी आमच्या दोन पक्षातील बोलणी अंतिम होणार असून त्यानंतरच शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शिकाँरा महाआघाडीचे राज्यात सरकार आणण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे आणि वेणूगोपाल हे शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी नरिमन पाँईट येथील यशवंतराव प्रतिष्ठान येथे आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पवार आणि काँग्रेसचे मल्लिकार्जून खर्गे, अहमद पटेल, वेणूगोपाल राव, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वर्तमान स्थितीबाबत काँग्रेसने चर्चा केली. शिवसेनेने काल सत्ता स्थापनेसंदर्भात अधिकृतरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी संपर्क साधला. पण आमची आघाडी असल्याने आधी आमच्यात चर्चा होणे गरजेचे असून आघाडीत व्यापक पध्दतीने चर्चा करण्याची गरज आहे. ही व्यापक चर्चा झाल्यानंतर आम्ही पुढील रणनीती जाहीर करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
शिवसेनेसोबत जाण्याचा अद्याप निर्णय आघाडी म्हणून झालेला नाही. मात्र काल सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा पाठिंबा देण्यासंदर्भात फोन आपल्याला आला होता अशी माहिती काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सांगितले.
सरकार स्थापनेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत व्यापक चर्चा करून पुढील प्रश्नांची चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर आघाडी म्हणून आम्ही शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अहमद पटेल यांनी महाराष्ट्रात राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या कृत्यावर टीका केली. तसेच राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निर्णय घेतला नाही. तसेच राज्यपालांकडून लोकशाहीची चेष्टा उडविण्याचा प्रकार सुरु असून राज्यपालांनी पहिल्यांदा भाजपाला बोलाविले. त्यानंतर शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला बोलावले. मात्र त्यांनी काँग्रेसला निमंत्रण दिले नसल्याबाबत राज्यपालांच्या कृत्याची त्यांनी निंदा केली.
सकाळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यानुसार चर्चेसाठी आम्ही येथे आलो.सेनेने पाठिंबा मागितला. त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता आम्ही निवांतपणे चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगत आमच्यातली चर्चा पूर्ण झाल्यानंतरच शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नमूद करत सरकार बनवायच की नाही हा मुद्दा नाही. परंतु सरकार बनविण्यासाठी कोणती समाननीती असावी यावर आमच्यात चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags ahmad patel balasaheb thorat congress jayant patil mallikarjun kharge ncp prafulla patel sharad pawar shivsena venugopal rao
Check Also
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो
देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …