औरंगाबाद : प्रतिनिधी
दोन व्यक्तींमधील वाद अथवा भांडणे सोडविण्यासाठी नागरिकांकडून पोलिसांच्यावर विश्वास दाखवित त्यांच्याकडे धाव घेतात. मात्र तुरूंगातील कैद्याचा मृत्यू रूग्णालयात झाल्याने त्याची नोंद घेण्यावरून औरंगाबादेतील दोन पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षकच एकमेकांवर धावून जात भांडणे करत असल्याचा अजब किस्सा नुकताच घडला.
सहा महिन्यांपासून हर्सूल कारागृहातील एक कैदी बबन चंदू सोनवणे (वय ४०) यास घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारा दरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. कायदेशीर बाब म्हणून याबाबतची नोंद रूग्णालयाच्या जवळ असलेल्या पोलिस ठाण्यात आवश्यक असते. मात्र सदर कैद्याच्या मृत्यूची नोंद घेण्या आणि न घेण्यावरून बेगमपुरा पोलिस निरीक्षक राजश्री आडे आणि हर्सूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
हर्सुल पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मनिष कल्याणकर यांच्या मते सदर आरोपी जरी हर्सुल तुरूंगातील असला तरी त्याचा मृत्यू बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाटी रूग्णालयात झाली. त्यामुळे त्याविषयीची तक्रार बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंदविणे गरजे असल्याचे भूमिका कल्याणकर यांनी घेतली. मात्र कैदी शिंदेचा रूग्णालयातील मृत्यू हा आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याची भूमिका बेगमपूरा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक राजश्री आडे यांनी घेतल्याने या दोन्ही पोलिस निरिक्षकांमध्ये चांगलाच वाद ऐन पोलिस ठाण्यातच रंगला. त्यामुळे हर्सुल पोलिस ठाणे आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांची चांगलेच मनोरंजन झाले.
दिवसभर या भांडणाची औरंगाबादेतील सर्वच पोलिस ठाण्यात चांगलीच दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. अखेर हर्सूल कारागृह हे हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. पण कारागृहात मृत्यू झालेल्या घटनेची नोंद हर्सूल पोलिस ठाण्यात होते. तर उपचारा दरम्यान हर्सूल कारागृहातील कैदी दगावला तर त्याची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करावी असा लेखी आदेश कोर्टानेच काढलेला असल्याची बाब जेव्हा बेगमपूरा पोलिस ठाण्याच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा कुठे या दोन पोलिस निरिक्षकांच्या वादावर पडदा पडला.