मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना येणाऱ्या वीज बीलाच्या रकमेत बचत होण्याकरीता राज्याच्या ऊर्जा विभागाकडून एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने शहर, तालुका आणि जिल्ह्यातंर्गत रस्त्यांवर तब्बल २० लाख एलईडीच्या दिवे बसविण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईईएसएल आणि ऊर्जा विभागा दरम्यान आज बुधवारी दुपारी सांमज्यस करार करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या स्ट्रीट लाईटींग प्रोग्रामतंर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये २० लाख एलईडीचे दिवे बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नांदेड या शहरांमध्ये एलईडीचे दिवे बसविण्यात येणार आहेत. तर यापूर्वी वापरण्यात येणारे सोडियम व्हेपर, मर्क्युरी व्हेपर दिव्यांना कायमची सुट्टी देण्यात येणार आहे. केंद्राच्या या योजनेंतर्गत राज्यातील जवळपास ३९४ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने एलईडीचे दिवे लावण्यात येणार आहेत.
या एलईडी दिव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वीज बीलात ५० टक्के बचत होणार आहे. याशिवाय एलईडी दिवे बसविणे, त्याची देखभाल करणे, दुरूस्ती करणे, वॉरंटीमध्ये अदलाबदल करून देणे आदी गोष्टींची जबाबदारी ईईएसएल कंपनीवर राहणार आहे. तसेच एकदा दिवे बसविल्यानंतर सेंट्रल कंट्रोल मॉनिटरींग सिस्टीम या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे वीजबंद होण्याची शक्यता कमी राहणार असल्याची माहिती ऊर्जा विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.