मुंबई : प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे ना.म.जोशी रोड, वरळी, नायगांव येथील खुराड्या वजा घरात रहात असलेल्या बीडीडीतील चाळकरी मुंबईकरांना ५०० चौ.फु.चे घर मिळणार आहे. या चाळींच्या पुर्नविकासासाठी म्हाडाला तब्बल ४५ हजार कोटीं रूपयांची गरज लागणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ३ हजार ५०० कोटी रूपयांचे फायनान्शियल मॉडेल म्हाडाने तयार केले असून या मॉडेलला राज्य सरकारच्या मंजूरीची प्रतिक्षा असून हे मॉडेल सरकारने मंजूर केले तरच या प्रकल्पाची अंमलबजावणी सहज शक्य असल्याची माहिती म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.
राज्य सरकारकडून बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाचा निर्णय घेतला. मात्र हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद राज्य सरकारने न करता त्याची जबाबदारी म्हाडावर सोपविण्यात आली. म्हाडाचे वर्तमानस्थितीत एक हजार ते दिड हजार कोटी रूपयांचे बजेट आहे. तर बँकामध्ये ठेवण्यात आलेल्या रकमा या जवळपास ६ ते ७ हजार कोटी रूपयांच्या घरात आहेत. परंतु, बीडीडी चाळीच्या पुर्नविकासासाठी ४५ हजार कोटी रूपये कसे उभे करायचे याबाबत प्रश्नचिह निर्माण झाले. म्हाडाकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर एकदम रक्कम उभी करण्याचे ठरविले. तर म्हाडा कर्मचाऱ्यांचे पगार देणेही अवघड बनणार असल्याची भीतीही या अधिकाऱ्याने यावेळी व्यक्त केली.
त्यावर तोडगा म्हणून म्हाडाकडून बीडीडी चाळींच्या पुर्नविकासाकरीता एक फायनान्शियल मॉडेल तयार करण्यात आले असून या इमारतींचा टप्प्याटप्प्याने पुर्नविकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. या पैशामधून बीडीडीच्या प्रत्येकी ८ ते १२ इमारतींच्या पुर्नविकासाचे काम एकदम हाती घेण्यात येणार आहे. या ८ ते १२ इमारतीमधील रहिवाशांचे पुर्नवसन करून त्या इमारतींच्या उर्वरीत जागेवर विक्रीयोग्य सदनिकांचे टॉवर उभारून त्यातून पुढील पुर्नविकासाला रक्कम उभी करण्याची योजना म्हाडाकडून तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या फायनान्शियल मॉडेलप्रमाणे गेले तरच बीडीडी चाळींचा पुर्नविकास करणे शक्य होणार आहे. याऐवजी दुसऱ्या कोणत्याही पर्यायाचा विचार केला. तर मात्र त्याचा थेट आर्थिक फटका म्हाडाला बसू शकतो आणि त्याचा परिणाम या प्रकल्पावर होवू शकतो अशी शक्यताही या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
याविषयीचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे अर्थात गृहनिर्माण विभागाला पाठवून दिला आहे. मात्र त्यावर अद्याप राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत गृहनिर्माण विभागात याबाबत विचारणा केली असता यासंबधीचा प्रस्ताव अद्याप आलेला आहे किंवा नाही याची पहाणी करावी असे उत्तर या विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
काय आहे फायनान्शियल मॉडेल ?
८ ते १२ इमारतींचा एकदम पुर्नविकास करण्यात येणार. या इमारतींच्या जागेवर एकाबाजूला पुर्नवसितांसाठी टॉवर उभारण्यात येणार आहे. तर दुसऱ्याबाजूला विक्री योग्य सदनिका बांधण्यात येणार असून या इमारतींच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून दुसऱ्या टप्प्यातील ८ ते १२ इमारतींच्या पुर्नवसनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या पध्दतीने नायगांव, ना.म.जोशी रोड, वरळी येथील इमारतीच्या पुर्नविकासाचे आणि अतिरिक्त घरांची निर्मिती केली जाणार आहे. या पध्दतीने केलेल्या पुर्नवसनाच्या कामामुळे म्हाडाला पैशाची चणचण भासणार नाही. तसेच हा प्रकल्पही किमान ५ ते ८ वर्षात पूर्ण होणार आहे.
काय असेल एका सदनिकेची किमान किंमत ?
वरळी, नायगांव आणि ना.म.जोशी रोडवरील बीडीडी पुर्नवसन प्रकल्पातील विक्री योग्य एका सदनिकेची किंमत किमान ४५ लाखापासून ते १ कोटी २५- ५० लाख रूपयांपर्यंतची असणार आहे. जर या प्रकल्पासाठी म्हाडाला निधीची कमतरता पडली तर बँकेकडून म्हाडाला कर्ज काढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. परंतु जर कर्ज काढले, तर सध्याच्या या किंमतीपेक्षाही वाढीव दराने म्हाडाला घरे विकण्याचा पर्याय राहणार नाही नसल्याचे म्हाडाच्या मार्केटींग विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.