मुंबई : प्रतिनिधी
समाजाच्या मुख्य प्रवाहात ज्या पध्दतीने स्त्री-पुरूषांना सन्मानाने जगता येते. त्याच पध्दतीने तृतीयपंथीयांनाही सन्माने जगता यावे याकरिता तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज केली.
राज्य सरकारने तृतीयपंथी व्यक्तींचा विकासासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने तृतीयपंथी समितीच्यावतीने लक्ष्मी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट घेत चर्चा केली. महाराष्ट्रातील तृतीय पंथियांचे कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी येत्या १५ दिवसात राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना व रचना करण्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे केली.
समाजात इतर सर्वसामान्य नागरीकांप्रमाणे तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारने २०१४ साली कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच २०१७-१८ सालच्या या अर्थसंकल्पात या मंडळासाठी ५ कोटी रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री कांबळे यांनी दिली.
समाजात तृतीयपंथीयांना हि़जडा, पावग्या, खोजे, बांदे, देवडा, फालक्या, फटाडा, मुगलमुखी, तिरूगई, खोती, आखुई, शिवशक्ती, लुगडवाला, जोगते, किन्नर, एमल या विविध नावांनी ओळखले जाते. या सर्वांना समाजात इतरांप्रमाणे मान-सन्मानाने जगता यावे यासाठी हे मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळाची रचना कशी असावी यासंदर्भात मेमोरड्म ऑफ असोसिएशनचा मसुदा राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आले असून तो मसुदा लवकरच मंजूर होवून येईल अशी आशा व्यक्त करत आगामी १५ दिवसात त्याबाबत कारवाई करून तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.