पुणे : प्रतिनिधी
भिमा कोरेगांव येथील दलित समाजावर झालेल्या हल्ल्याच्या पाठीमागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हेच आहेत. संभाजी भिडे यास अटक करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी २६ मार्च रोजी काढण्यात येत असलेल्या एल्गार मोर्चास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा देत यात सहभागी होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
२६ मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या एल्गार मोर्चा मध्ये संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांसह संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी उतरणार आहे. या एल्गार मार्चची जी प्रमुख मागणी आहे, ‘मनोहर भिडेला त्वरित अटक व्हावी’ ही संभाजी ब्रिगेडची सुद्धा सुरूवातीपासूनची मागणी राहिलेली आहे. १ जानेवारीला आपल्या पूर्वजांना, शहिदांना वंदन करायला जे मराठा, बहुजन समाजातील लोक गेले होते. त्या लोकांवर माथेफिरू गुंडांनी जो भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्यामागचे सूत्रधार हे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे आहेत. त्याच बरोबर या मनोहर भिडेंचा असा इतिहास आहे, की छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजांची बदनामी करण्यात त्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे. तसेच हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा असा वाद निर्माण करण्यासाठी ही त्यांनी तरुण पोरांची माथी भडकवली आहेत. त्यामुळे या हल्ल्यांमागचा मास्टरमाईंड मनोहर भिडेला त्वरित अटक व्हावी. या मागणीसाठी हा जो एल्गार मोर्चा होत आहे त्यात ‘संभाजी ब्रिगेड’ सर्व ताकदीनिशी सहभागी होत असल्याचे त्यांनी प्रसिद्दी पत्रकात म्हटले आहे.